पुणे – समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेने तब्बल 52 पाणीटाक्या मंजूर जागेव्यतिरिक्त इतरत्र उभारल्या. या टाक्यांचे काम पूर्ण होतानाच, आता त्यांच्यासाठी स्वतंत्र सीमाभिंती बांधाव्या लागणार आहेत. त्यासाठी नव्याने 40 ते 50 कोटींचा खर्च महापालिकेस करावा लागणार असल्याचे समोर आले आहे.
आधीच सल्लागाराच्या चुकीमुळे जलवाहिन्यांचा खर्च 52 कोटींनी वाढलेला आहे. त्यातही सल्लागाराने या योजनेचे उर्वरित काम करण्यास नकार दिल्याने नवीन सललागारासाठी 15 ते 20 कोटींच्या वाढीव खर्चाचा बोजा पडणार आहे. त्यातही आता सीमाभिंतींसाठी वाढीव खर्च करावा लागणार आहे.
या योजनेअंतर्गत महापालिकेने 82 पाणी टाक्या प्रस्तावित केल्या होत्या. प्रत्येक टाकीसाठी सुमारे 20 ते 30 गुंठे जागा लागते. त्यानुसार योजना प्रस्तावित करताना प्रशासनाने टाक्यांसाठी महापालिकेच्या ताब्यातील ऍमेनिटी स्पेस (सेवा क्षेत्र) निश्चित केल्या होत्या. या जागा सीमाभिंत तसेच गेट बसवूनच ताब्यात घेतल्या जातात. मात्र, शहरात या जागा देण्यास अनेक ठिकाणी नगरसेवकांनी विरोध केला. तसेच, पाण्याची टाकी बांधू नये या ठिकाणी नागरिकांसाठी उद्याने तसेच इतर सुविधा द्यायचे असल्याचे सांगत कामच सुरू करू दिले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनास टाक्यांसाठी आसपासच्या परिसरात जागा ताब्यात घ्याव्या लागल्या.
पालिकेने अशा सुमारे 52 टाक्या नियोजित जागा सोडून बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या टाक्यांचे काम पूर्ण होताना, आता सुरक्षेच्या कारणासाठी या टाक्यांना सीमाभिंत बांधाव्या लागणार आहेत. परिणामी, या भिंतीसाठी सरासरी 80 लाख ते 1 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे आता हा वाढीव खर्च महापालिकेस करावा लागणार असून त्याच्या निविदा टप्प्याटप्प्याने काढण्यात येत आहेत.