मुंबईतच सर्वांना ठेवण्याची महापालिकेची तयारी
मुंबई : देशात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या 150 च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. यादरम्यान, संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमानसारख्या आखाती देशातून 26 हजार भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मुंबई महानगपालिकेने दिलेल्या माहितीनुसार या देशांमधून दररोज 23 विमाने भारतात येत असतात. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमान यादेशातून आलेल्या प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवणे अनिवार्य आहे. 18 मार्चपासून हा आदेश लागू झाला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
यापूर्वी दुबईवरून महाराष्ट्रात आलेल्या 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या इंजिनिअर्ससाठी पवईत उभारलेल्या एका ट्रेनिंग सेंटरला क्वारंटाईन सेंटरमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त मुंबईतील सेव्हेन हिल्स रूग्णालयातही आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. पवईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये काही कॉन्फरन्स रूम आहेत त्यामध्येही काही बेड लावण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
आखाती देशातून येणारे भारतीय नागरिक 31 मार्चपर्यंत मुंबईत पोहोचणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी अनेक भारतीय कामानिमित्त आखाती देशांमध्ये वास्तव्यास आहेत. यापैकी येणाऱ्या लोकांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. ज्यांचे मुंबईत घर आहे आणि ज्यांची प्रकृती उत्तम आहे त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. परंतु त्यांना आपल्या घरातील अन्य व्यक्तींपासून काही दिवस वेगळे राहावे लागणार आहे.
तसेच जे लोक मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणाहून असतील आणि ज्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता नसेल त्यांनाही त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे. त्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणार नाही, त्यांना खासगी वाहनातूनच जावे लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जे लोक दूर राहणारे असतील त्यांना सेव्हन हिल्स रूग्णालयातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात येईल. त्यांना देशातील कोणत्याही भागात विमानाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.