दिवसभरात करोनाबाधित 811 नवीन रुग्णांची नोंद
मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. राज्यात आज करोनाबाधित 811 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहोचली आहे. तर करोनाबाधित 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील चिंता वाढली आहे.
राज्यात आज 119 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 1076 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज झालेल्या 22 रुग्णांच्या मृत्यूंपैकी मुंबईत 13, पुण्यात 4, पुणे ग्रामीण भागात 1, पिंपरी चिंचवडमध्ये 1, मालेगावात 1, धुळे शहरात 1 तर सोलापूर शहरात 1 मृत्यू झाला आहे. राज्यातील झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या 323 झाली आहे.
22 रुग्णांच्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर सहा महिला होत्या. 60 वर्षे वरचे वयावरचे 11 रुग्ण यामध्ये होते. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातले होते. तर 3 रुग्ण हे 40 वर्षांखालील होते. 22 रुग्णांचे मृत्यू झाले त्यामधील 13 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार होते.
करोनामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 8 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत. तर 7 हजार 628 जणांचे नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 25 हजार 393 लोक होम क्वारंटाइन आहेत तर 8 हजार 124 लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.