संतप्त नितीश म्हणाले, ज्यांना जायचे त्यांनी जावे
पाटणा : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूमध्ये भाजपबरोबरच्या मैत्रीवरून मोठा बेबनाव निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरूनही (का) जेडीयूमधील मतभेद उघड होत आहेत.
त्यामुळे त्रासलेल्या नितीश यांनी ज्यांना पक्षाबाहेर जायचे असेल त्यांनी जावे, अशा आशयाची संतप्त प्रतिक्रिया दिली.
संसदेत मंजुरी मिळाल्याने संबंधित विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये (का) झाले. त्या विधेयकाला जेडीयूने संसदेत पाठिंबा दिला होता. आता काविरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. तशात जेडीयूमधून काविरोधी सूर उमटू लागले आहेत.
त्या पक्षाचे महत्वाचे नेते असणाऱ्या प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांनी जाहीरपणे काविरोधी भूमिका मांडली आहे. वर्मा यांनी तर पुढे जात भाजपबरोबर दिल्लीतही मैत्री करण्याला आक्षेप घेतला आहे. त्याविषयी भूमिका मांडताना वर्मा यांनी नितीश यांना उद्देशून पत्र लिहिले. ते पत्र त्यांनी सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले.
त्यामुळे खवळलेल्या नितीश यांनी गुरूवारी वर्मा यांना एकप्रकारे इशारा दिला. वर्मा हे विद्वान व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदराची भावना आहे. मात्र, त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर त्यांची भावना मांडायला हवी होती. त्यांना आवडेल तिथे त्यांनी जावे, असे नितीश यांनी म्हटले.