इस्लामाबाद – पंतप्रधान इम्रान खान यांनी आज शुक्रवारी देशाचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केले आहे. या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात आर्थिक सुरक्षा धोरण हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून या आधी राष्ट्रीय सुरक्षेत केवळ लष्कराला प्राधान्य दिले जात असे ते आता मागे पडले आहे.
पाकिस्तानला आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात या आधीची सरकारे कमी पडली. पण आता मात्र ही चूक आम्ही सुधारली आहे असे इम्रान खान यांनी यावेळी नमूद केले. या धोरणाचा मसुदा शंभर पानी आहे. नागरीकांचे पुर्ण हित लक्षात घेऊन देशाला आर्थिक सुरक्षा कशी प्रदान केली जाऊ शकते याच्या बाबी यात नमूद करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की देश अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत देशाची सुरक्षा म्हणजे केवळ लष्करी धोरण एवढ्या पुरतेच मर्यादित होते. आता आम्ही देशासाठीचे योग्य व सुनियोजित सुरक्षा धोरणच निश्चीत केले आहे असे त्यांनी म्हटले आहे. सन 2022 ते 2026 या पाच वर्षाच्या कालावधीसाठीचे हे धोरण आहे.
देशाचा सर्वसमावेश आर्थिक विकास झाल्याशिवाय लोकांना न्याय मिळणार नाही आणि तोपर्यंत ते देशाच्या आर्थिक उभारणीत आपला वाटा देऊ शकणार नाहींत हे लक्षात घेऊनच हे धोरण निश्चीत केले जात आहे असे त्यांनी म्हटले आहे. या धोरणात देशाचे आर्थिक भवितव्य, संरक्षण, प्रादेशिक एकोपा, अंतर्गत सुरक्षा, आणि विदेश नीती असे सारे विषय एकत्रित करण्यात आले आहेत.