मुंबई : अवकाळी पावसाने राज्यात हाहाकार माजवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल होऊन सरकारी मदतीकडे आस लावून बसला आहे. या शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे.
Maharashtra: Governor announces a relief of Rs. 8000 per hectare up to 2 hectare for agricultural Kharif crops & a relief of Rs. 18000 per hectare up to 2 hectares for horticulture/perennial crops, following damage to crops by unseasonal rains during Oct-Nov. pic.twitter.com/jeV3GbaPmN
— ANI (@ANI) November 16, 2019
राज्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांसाठी ८००० रुपये प्रति हेक्टर आणि बारामाही पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येणार आहे. खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर ८ हजार रुपये आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे. यासोबतच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. त्यामुळे चिंतेत असणाऱ्या शेतकरी राजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
दरम्यान राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपाल कार्यभार सांभाळत आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या निगराणीत शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जाणार आहे. यापूर्वी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन मदत जाहीर करण्याची मागणी केली होती.