नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारचा यंदाच्या वर्षात अर्थसंकल्प सादर केला. सादर करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतीमाल वेगाने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन महत्त्वाच्या योजनांची घोषणा सीतारामन यांनी केली.
कृषी उडान आणि कृषी रेल अशी या दोन योजनांची नावे आहेत. कृषी उडान योजना नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून तर कृषी रेल योजना रेल्वे मंत्रालयाकडून अंमलात आणली जाईल. कृषी उडान योजनेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील आणि देशाच्या आदिवासी भागातील कृषी उत्पादने इतर बाजारांमध्ये नेण्यासाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली जाईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही मार्गांवर ही सेवा उपलब्ध करण्यात येईल.
सरकार आणि खासगी या दोन्हींच्या भागीदारीतून (पीपीपी) किसान रेल सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. या रेल्वेच्या माध्यमातून नाशवंत कृषी उत्पादने वेगाने बाजारापर्यंत नेली जातील. यासाठी या गाडीमध्ये वातानुकूलित मालगाडीचे डबेही असतील. जिल्हास्तरावील फलोत्पादनाकडे सरकार विशेष लक्ष देईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. एक जिल्हा एक फलोत्पादन अशा पद्धतीने रचना करण्यात येईल. ज्याचा प्रत्येक फलोत्पादनाच्या मार्केटिंगसाठी उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.