योजने अंतर्गत नववधूंना सरकार देणार 1 तोळे सोने
नवी दिल्ली :आसाममधील भाजप सरकार नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील नववधूंना एक मोठे गिफ्ट देत आहे. आसाममधील सरकारने अरुंधती स्वर्ण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार प्रत्येक नवविवाहित वधूला 10 ग्रॅम सोने सरकारकडून देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने या योजनेची घोषणा केली होती. अर्थात सरकारने या योजनेमध्ये काही नियम आणि निकषही लागू केले आहेत. 1 जानेवारी 2020 पासून ही योजना लागू होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्नावेळी वधूचे वय 18 वर्षे आणि वराचे 21 वर्षे असणे आवश्यक आहे. वधूने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लग्न नोंदणी कायद्यानुसार संबंधित लग्नाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. वधूच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. केवळ पहिल्या लग्नासाठीच या योजनेतून सोने मिळणार आहे.
या योजनेनुसार वधूला लग्नाचे नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्याची फेरतपासणी झाल्यानंतर 30 हजार रुपये संबंधित वधूच्या बॅंक खात्यात जमा केले जातील. यानंतर त्या पैशातून सोने खरेदी करून त्याची पावती जमा करावी लागेल. या पैशांचा उपयोग अन्य कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी करता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.