शिवेंद्रसिंहराजेंची मागणी; तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी
सातारा – सर्वत्र पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा आणि जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगर खचणे, घरे पडणे यासह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे अक्षरश: हाहाकार उडाला असून जावली तालुक्यामध्ये भुस्खलन आणि डोंगर, दरडी कोसळणे यामुळे मोठी हानी झाली आहे. सातारा, जावळीसह सातारा जिल्ह्यात शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्वरीत पंचनामे करुन लवकरात लवकर बाधितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली आहे.
याबाबत पत्रकात म्हटले आहे की, पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पेरणी केलेली पिके गेली आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. मोरेवाडी येथे डोंगर कोसळल्याने अनेक घरे बाधीत झाली आहेत. जावळी तालुक्यातील घोटेघर आणि मेरुलिंग डोंगर कोसळल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत. सातारा आणि जावळी तालुक्यातील अनेक घरांमध्ये आणि शाळेतील खोल्यांमध्ये पाणी घुसले आहे. अनेक घरांमध्ये पाण्याचे उपळे लागले आहेत. सातारा, जावळीसह अन्य तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत, नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन पडलेली घरे दुरुस्त करण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे आज अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले असून त्यांना अन्नपाणी
मिळणे मुश्किल झाले आहे. यासाठी शासनस्तरावरुन तातडीने निधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नुकसानीचे पंचनामे होणे अत्यावश्यक असून पंचनामे त्वरीत सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला सूचना कराव्यात. पंचनामे त्वरीत करुन निधी उपलब्धतेसाठी गतीने हालचाल करावी. तसेच सातारा जिल्ह्यात ओळा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानभरपाईसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.