पुणे – राज्यातील निवडणुका सतत लांबणीवर जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र तरीही निवडणुका जाहीर करण्यात आल्या नाहीत. सत्ताधाऱ्यांनी मिळून निवडणुकांबाबतचा निर्णय घेतला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी तारीख पे तारीख न करता निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यपाल या पदावर बसणारी व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करते. त्यावेळी त्यांना पदावर बसवणाऱ्या व्यक्तींनी राज्यपालांना काही सल्ले दिले पाहिजे.
त्यांनी आजपर्यंत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. एकदा घडले तर समजू शकतो, मात्र सातत्याने अशी वादग्रस्त वक्तव्ये करतात. त्यामुळे त्यांचे लंगडे समर्थन करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, अशी टीका पवार यांनी केली.
रोज अनेक नेते वक्तव्य करत असतात. त्यात अनेकांडून अनावधानाने चुकून एखादे विधान केले जाते. त्यानंतर त्या विधानाबाबत अनेक नेते दिलगिरी देखील व्यक्त करतात.
मात्र राज्यपालांकडून सातत्याने अशी वक्तव्य केली जातात. ही चुकीची बाब आहे. मला आता माझ्या राज्यात परत जाऊन द्या, असं राज्यपालही खासगीत सांगतात, असा गौप्यस्फोट पवार यांनी केला.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यात सुरू असलेल्या वादावरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या वतीने या प्रश्नासाठी नेमले आहे.
दोघेही वकिलांशी चर्चा करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कारण नसताना कटूता निर्माण होतील, असे वक्तव्य करत आहेत. दोन राज्यांत काहीही झाले तरी कटूता निर्माण होता कामा नये, दोन्ही राज्यकर्त्यांनी आपली राज्य चालवावी. दोघांच्या वतीने सीमावादाची सर्वोच्च न्यायालयात केस सुरु आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय द्यावा, असेही पवार म्हणाले.
विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज
देशात महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्वाचे प्रश्न असताना बाकी गोष्टींवरुन राजकारण सुरु आहे. राजकारण आणि चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक महत्वाचे विषय आहेत. शेतकऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत. ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहे. पिक विमा, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे प्रश्न आहेत. यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.