नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेज उलगडून सांगण्याची प्रक्रिया काल पुर्ण केल्यानंतर या पॅकेजचा सर्वंकष आढावा घेताना कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी या पॅकेज विषयी निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे पॅकेज होपलेसली अपुरे असून त्यातून गरीब, स्थलांतरीत, शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, आणि मध्यमवर्गीयांना निराशच केले आहे. त्यामुळे सरकारने या पॅकेजचा फेर विचार करून जीडीपीच्या दहा टक्के इतका खर्च करणारे नवीन पॅकेज सरकारने जाहीर केले पाहिजे.
आज सरकारने जे पॅकेज जाहीर केले आहे त्यात सरकारचा खर्च केवळ 1 लाख 86 हजार कोटी रुपये इतकाच आहे. हा खर्च जीडीपीच्या केवळ 0.91 टक्के इतका आहे. त्यामुळे तो अपुरा आहे, यातून कोणत्याच वर्गाचे समाधान झालेले नाही. त्याऐवजी सरकारने जीडीपीचा 10 टक्के इतका खरा खर्च करून दुसरेच पॅकेज जाहीर केले पाहिजे.
सरकारने या पॅकेजच्या नावाखाली संधीसाधूपणा केला असून त्यांनी सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा डाव साधला आहे. या संकटाच्या काळाचा फायदा घेऊन त्यांनी संसदेला टाळून परस्परच या आर्थिक सुधारणा घोषित केल्या आहेत. सरकारने संसदेला जाणीवपूर्वक टाळले आहे असा आरोप करून त्यांनी म्हटले आहे की, निदान त्यांनी या विषयी संसदीय समितीत तरी चर्चा करायला हवी होती. पण त्यांनी तीही केलेली नाही असेही त्यांना निदर्शनाला आणून दिले.