मुंबई: देशात कर रुपाने सर्वात जास्त पैसा मुंबईतून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र आणि विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररुपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होतो. पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संकटाचा सामना करण्यासाठी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा मंगळवारी केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण याविषयी तीन दिवस विस्तृत माहिती देत आहेत.