वर्क फ्रॉम होमची संस्कृती तारक की मारक या प्रश्नाचे उत्तर ज्याने – त्याने आपल्या परीने शोधणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे सर्वकाही आहे, त्यांच्यासाठी ती तारक आहे तर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठी ती नक्कीच मारक आहे. घरातून काम करताना येत असलेल्या अडचणीही प्रत्येक घरागणिक निराळ्या आहेत. काही ठिकाणी इंटरनेटसाठी रेंज न मिळण्यापासून स्वतंत्र शांत जागेच्या अभावापर्यंत समस्या येत असतात. काही वेळा घरी येणारे पाहुणे आणि डिस्टर्ब करणारे आवाजही टाळता येत नाहीत. एकूणच “वर्क फ्रॉम होम’ याविषयीचे हे सखोल चिंतन…
वर्ष 2020 च्या सुरुवातीचे दोन महिने आनंदात गेल्यावर चीनमध्ये नोवल करोना नावाच्या विषाणूचे थैमान सुरू असल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. पुढे हा विषाणू एक-एक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. आपला भारत देशही त्यास अपवाद नव्हता. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या आजाराने भारतासह संपूर्ण जगात असे काही तांडव केले की, संपूर्ण जगाची गती थांबवण्याची वेळ माणसावर आली. इटली, स्पेन, ब्रिटन, जर्मनी भारतासह अनेक देशांत लॉकडाऊन लागले. परिस्थिती भयावह होती. कामकाज पूर्णपणे ठप्प होते. अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली. अशावेळी युरोपीय देशांमध्ये “वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती तग धरून होती. ज्या देशांमध्ये ही संस्कृती नव्हती, त्यांनी ती आत्मसात करण्यास सुरुवात केली.
भारताची परिस्थिती थोडी वेगळी होती. भारताला “वर्क फ्रॉम होम’ नवीन नव्हते, पण अगदीच मर्यादित स्वरूपात देशात अस्तित्वात होते. एखाद्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारीच या संस्कृतीत मोडायचे. बाहेर एखादे मोठे संकट आ वासून उभे असताना संपूर्ण देश उघडणे अशा वेळेस शक्य नव्हते, अशावेळी काही ठराविक लोकांपूर्ती मर्यादित असलेली “वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती भारतात तळागाळापर्यंत रूजविण्यास सुरुवात झाली.
भारतात जेथे इंटरनेट नव्हते तेथे ते जोडण्यात आले. संगणक, लॅपटॉप, मोबाइल यांचा पुरवठा वाढला. जेथे संगणक आणि इंटरनेटची गरज नव्हती तेथे डिलिव्हरी सिस्टम मजबूत करण्यात आली. शेतकऱ्यांना ग्रामपंचायतींना आणि ग्रामपंचायतींना बाजार समितीशी जोडण्यात आले. कोर्ट – कचेरीचे काम घरून सुरू करण्यात आले. आरोग्य सुविधांना फोनची जोडण्यात आले. “वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती भारतात आता सुरू होऊन साधारणपणे आठ महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे त्याचे मूल्यमापन करणे आणि त्यातून आपण काय मिळविले व काय गमावले याचा उहापोह करणे गरजेचे आहे.
“वर्क फ्रॉम होम’चे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील…
* वर्क फ्रॉम होममुळे कठीण परिस्थितीतही कामकाज प्रभावित न करता काम करणे सहज शक्य आहे.
*घरात बसूनच काम करायचे असल्यामुळे अनेकांना आपल्या कुटुंबासाठी वेळ देणे शक्य झाले. परिणामी कौटुंबिक एकोपा वाढण्यास मदत झाली.
* देशातील अनेक उद्योगधंदे एकमेकांशी इंटरनेट आणि मोबाइलद्वारे जोडले गेल्यामुळे कमीत कमी वेळात एकमेकांशी संपर्क साधणे शक्य झाले.
* “वर्क फ्रॉम होम’मुळे शहरी भागात एका विशिष्ट वेळेत होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात आली. परिणामी इंधनाची बचत तर झालीच, शिवाय शहरांच्या प्रदूषण पातळीत घट झाली.
*”वर्क फ्रॉम होम’मुळे अनेकांनी कामकाज आणि दैनंदिन जीवनावर व्यतिरिक्त इतर अनेक नवीन गोष्टी आत्मसात केल्या.
* प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे वर्क फ्रॉम होमचे तोटेसुद्धा आहेत.
* प्रत्येक क्षेत्रात “वर्क फ्रॉम होम’ची सुविधा आणणे शक्य नाही. उदा : स्वच्छता आणि सुरक्षा
* “वर्क फ्रॉम होम’मुळे अनेक जण मागील काही महिन्यात घराबाहेरच पडले नाहीत. परिणामी एकलकोंडेपणा, आत्मविश्वासाची कमी याशिवाय इतर मानसिक आजारांच्या रुग्णात वाढ झाली.
*केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च ते ऑक्टोबर ह्या काळात घरगुती हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली.
*पुणे, मुंबई सारख्या शहरात जेथे दाट लोकवस्ती आहे. तेथे एकाच घरात अनेक माणसे असल्यामुळे अनेकांचे कामकाज प्रभावित झाले. प्रत्येकाच्याच घरात चांगले वातावरण असते तसे नाही त्यामुळे अनेकांना “वर्क फ्रॉम होम’ची सुविधा मिळून त्याचा योग्य लाभ घेता आला नाही. भारतात वर “वर्क फ्रॉम होम’ची सुविधा राबविताना अनेक समस्या आल्या. त्यातील काही योग्य प्रकारे प्रशासनाकडून हाताळल्या गेल्या असल्या तरी काही आजही अस्तित्वात असून त्या समजणे गरजेचे आहे.
वर्ष 2015 मध्ये भारत सरकारने डिजिटल भारत योजनेंतर्गत भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड अर्थात बी.बी.एन.एलची निर्मिती केली. त्यानुसार देशातील 7.5 लाख ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे एकमेकांशी जोडण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत हे लक्ष पूर्ण झाले नसून देशांत अनेक ठिकाणी ग्रामपंचायती ह्या पारंपरिक पद्धतीने काम करताना दिसतात.
भारताची सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि कुरिअर सेवा आजही जागतिक बाजारपेठेत सुमार दर्जाची असल्यामुळे गरजेच्या आवश्यक गोष्टी ठराविक वेळेत इच्छित स्थळी पोहोचविणे शक्य होत नाही. टेली मेडिसीन, टेली लॉ यांसारख्या सुविधा भारतात सुरू असल्या तरीही देशातील काही ठरावीक भाग वगळता इतर ठिकाणी त्या नगण्य आहेत. भारतात डिजिटल डिव्हाइडची संख्या मोठी आहे. अनेक ठिकाणी देशात इंटरनेट आहे पण ते कसे वापरायचे याचे ज्ञान नाही. तर काही ठिकाणी ज्ञान आहे तर इंटरनेट नाही.
ईशान्येकडील राज्ये, हिमालयातील काही भाग आणि देशातील ग्रामीण भागात आजही इंटरनेट, रस्ते पोहोचलेले नाहीत. परिणामी, उदरनिर्वाहासाठी येथील लोकांना महामारीच्या काळातसुद्धा घराबाहेर पडणे आवश्यक बनते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताची गुंतवणूक अत्यल्प असल्यामुळे क्षमता असूनसुद्धा “वर्क फ्रॉम होम’ची सुविधा काही ठराविक क्षेत्र वगळता देशात इतर ठिकाणी राबविता आली नाही. “वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती तारक की मारक या प्रश्नाचे उत्तर ज्याने – त्याने आपल्या परीने शोधणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे सर्वकाही आहे, त्यांच्यासाठी ती तारक आहे तर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठी ती नक्कीच मारक आहे. परंतु, एक गोष्ट नक्की आहे की, “वर्क फ्रॉम होम’मुळे अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या हे नाकारून चालणार नाही.