सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचे आवाहन; नीरा-भीमा गळीत हंगाम शुभारंभ
रेडा – माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी विधानसभा निवडणूक ताकदीने लढलो. जय पराजय या गोष्टी राजकारणात असतात. त्यामुळे खचून जाण्याचे कारण नाही, असे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले.
नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 19व्या गळीत हंगामाचा शुभारंभ जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. इंदापुर दूध संघाचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील, नीरा-भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, माजी सभापती प्रशांत पाटील, विलासराव वाघमोडे, शासन नियुक्त संचालक अशोकराव वनवे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, श्रीमंत ढोले यांच्यासह सर्व संचालक व शेतकरी सभासद उपस्थित होते.
सभापती जगदाळे म्हणाले की, नीरा भीमा कारखाना अविरत सुरू आहे. जरी आम्ही विरोधात होतो, तरीदेखील या कारखान्याला ऊस गाळपासाठी देण्याची भूमिका घेतली. आपला कारखाना, आपली संस्था ही भूमिका ठेवून शेतकऱ्यांनीही सातत्याने नीरा-भीमाला ऊस द्यावा, असे आवानही जगदाळे यांनी केले.
नीरा-भीमाचा गळीत हंगाम तीन ते अडीच महिने चालविणार असून गेटकेन धारक ऊस उत्पादक शेतकर कारखान्या ऊस देतील. मागील कालावधीत दुष्काळाचे सावट होते, त्यावेळीही कारखान्याने जळीत झालेल्या उसाला कोणतीही कपात न करता दर दिला. अडचणीच्या काळात नीरा भीमा कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असतो, हे ऊस उत्पादक शेतकरी विसरणार नाहीत, अशी अपेक्षा संचालक उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांनी आभार मानले.
विना थांब कारखाना चालेल…
पशुधन जगविण्यासाठी कारखान्याने तीन ठिकाणी चारा छावण्या काढल्या. त्यामुळे यंदा कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस मिळणार नसला तरीदेखील तब्बल साडे अकरा हजार उसाच्या नोंदी कारखान्याकडे गाळपासाठी आहेत. त्यामुळे 75 दिवसाच्या आसपास हंगाम चालणार आहे. नीरा-भीमाने एफआरपीपेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना जाहीर केला आहे. कारखान्याच्या प्रशासनाने सर्व गाळपाची तयारी पूर्ण केली असून यावेळीही कारखाना विना थांबता चालेल, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी दिली.