मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात दीड वर्षापूर्वी लागू केलेले नवीन तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जाणार असल्याचे मोदी यांनी सांगितले आहे. आज पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी कृषी कायदे मागे घेणार असल्याचं म्हटलं. यावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे परत घेतले, त्याचा आनंद आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल अशी आशा अण्णांनी व्यक केली. त्याचवेळी शेतमालाला खर्चावर आधारित दर मिळावा यासाठी 600 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. या शेतकऱ्यांचं ऋण कायम लक्षात राहिल, असंही अण्णांनी म्हटलं.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे तीन कृषी कायदे रद्द झाले आहेत. याचं संपूर्ण श्रेय शेतकऱ्यांचं आहे. विरोधीपक्षाचं श्रेय नाही, असं म्हणत अण्णांनी विरोधकांना टोला लगावला.
देशाला आंदोलनाचा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. आंदोलन हा पर्याय आहे. शेतकऱ्यांनी देशभर केलेल्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागल्याचं अण्णा म्हणाले.