नगर (प्रतिनिधी) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी मोठे कार्य केले. या दुर्लक्षित घटकांच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. आपल्या शाहिरीतून समाज जागृतीचे काम केले. त्यांचे साहित्य समाज मनाला भिडणारे होते. जोपर्यंत समाज शिक्षित व जागृत होत नाही, तोपर्यंत त्यांची प्रगती नाही, हे जाणून त्यांनी समाजासाठी कार्य केले. त्यांच्या कार्याचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे, असे प्रतिपाद माजी नगरसेवक संजय शेंडगे यांनी केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी कदम म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. दुर्लक्षित व तळागाळातील समाजाच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडून समाजाला जागृत केले.