प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरण ः मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई – प्रीती राठी ऍसिड हल्ला प्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेल्या अंकुर पनवार याला उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. त्याची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप सुनाविण्यात आली आहे. ऍसिड हल्ल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला देशातील पहिलाच खटला असल्याने या खटल्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
नौदलाच्या रुग्णालयात नोकरीसाठी हजर होण्यासाठी प्रीती राठी या आपल्या कुटूंबियासोबत दिल्लीहून 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. गरीबरथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात उतरत असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अंकुर पनवारने ऍसिड हल्ला केला होता. शर्थीचे प्रयत्न करूनही प्रीतीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी पनवार याला सप्टेंबर 2016 साली फाशीची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षा विरोधात आरोपीने दाखल केलेले अपील आणि फाशीची ही शिक्षा कायम करण्यात यावी यासाठी सरकारच्या वतीने केलेल्या अर्जावर आज न्यायमूर्ती भुषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय आज दिला. न्यायलयाने आरोपी विरोधात दाखल केलेले आरोप आणि साक्षीपुरावे ग्राह्य मानत कलम 302 आणि कलम 326 (ब) चा विचार करता आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.