भांडवली खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल
मंचर- पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्यांनी फ्लॉवर, कोबी, बीट आणि अन्य तरकारी मालाला बाजारभाव नसल्याने पिकांमध्ये मेंढ्या व जनावरे चरण्यासाठी सोडली आहेत. भांडवली खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, ही शेतकऱ्यांची जुनीच मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
फ्लॉवर, कोबी, बीट पिकाला दहा किलोला 15 रुपयांपासून 30 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे, त्यामुळे झालेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले की, सरकार कोणतेही असले तरी शेतकऱ्यांची परवड थांबत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
याआधीचे पीक अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले, यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही आले नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. जी मिळाली ती अत्यंत अल्प आहे. शेतकऱ्यांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.