चौघांना केली अटक ः नान्नज दुमाला शिवारात पोलिसांची कारवाई
तळेगाव दिघे (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला जवळील पारेगाव चौफुलीवरून पिकअप गाडीत कत्तलीच्या उद्देशाने चालविलेल्या तीन गायी व तीन वासरांची पोलिसांनी सुटका केली. यावेळी पिकअपसह चार आरोपींना ताब्यात घेतले. सातत्याने कारवाई करूनही अशा घटना घडत असल्याने संगमनेरच्या कत्तलखाना चालकांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारेगाव चौफुलीवर एका पिकअपमधून (क्र. एमएच- 01 एलए- 3897) तीन गायी व तीन वासरे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे पोलीस नाईक अनिल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ या वाहनाचा पाठलाग केला. यावेळी या वाहनात दाटीवाटीने ही जनावरे कोंबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पिकअपसह जनावरांना ताब्यात घेतले. सदर करवाई संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अनिल जाधव, हेड कॉन्स्टेबल अशोक पारधी, होमगार्ड तुषार जोर्वेकर, सोमनाथ तोरामल यांनी ही कारवाई केली. यावेळी राजमहंमद चॉंद शेख, शकील शब्बीर मदारी, वसीम समा शेख, मोनू म्हमा शेख (सर्व रा. कुरण, ता संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे.
कारवाई करूनही कत्तलखाने सुरूच
संगमनेर पोलिसांकडून वारंवार येथील कत्तलखान्यांवर छापे घालण्यात आले आहेत. आजवर शेकडोवेळा कारवाया करीत हजारो किलो गोवंशाचे मांस नष्ट करण्यासोबतच हजारांहून अधिक गोवंश जनावरांना वाचविण्यात आले आहे. तसेच शकडो कसायांवर गुन्हेही दाखल झाले. मात्र असे असतांनाही संगमनेरचे कत्तलखाने बंद होत नसल्याने शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.