नगर -“अनिलभैया गेले’ ही वाईट बातमी समजली अन् धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात भिनली होती.त्यांचा प्रत्येक श्वास शिवसेनेसाठीच होता. तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला, अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे आज पहाटे निधन झाले. त्या वृत्तानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा शोकसंदेश पाठविला. काही दिवसांपूर्वीच अनिल भैय्यांशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. करोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतांनाच आज अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांरची प्राणज्योत मालवली. हा माझ्यासाठी मोठा आघात आहेच.
तसाच तो शिवसेना परिवारावर व राठोड त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांवरच आघात आहे. नगर जिल्ह्यातल्या जनतेने सुद्धा त्यांचा अनिलभैय्या गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोकसंदेशातून आपली भावना मांडली. युती सरकारच्या काळात मंत्रीमंडळात असलेले राठोड म्हणजे हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते.
रस्त्यावर स्वत: उतरून लोकांच्या प्रश्नांसाठी काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिवसेना जिल्ह्यात रुजविली. लोकांसाठी आंदोलने केली, त्यांच्या समस्यांची तड लावली. नगर शहरातून 25 वर्षे सतत आमदार म्हणून निवडून येत असले तरी रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता अशी ओळख सांगण्यात त्यांना अभिमान होता.
कुठलाही अहंकार नसलेला आणि आपला जन्मच मुळी लोकांसाठी झालेला आहे, असे समजणाऱ्या अनिल भैया यांच्या जाण्याने शिवसेनेतील आमच्या अत्यंत विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक आम्ही गमावला आहे, असेही संदेशात म्हटले आहे.
नगरचे कर्तुत्त्ववान नेतृत्व हरपले : उपमुख्यमंत्री
माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर अक्षरश: धक्काच बसला, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना शोकसंदेशातून व्यक्त केल्या. राठोड यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ केलेले कार्य सर्वांच्याच सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशा शब्दांत पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.