मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे.
दरम्यान, देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे.
1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.
राष्ट्रवादी काँग्रहेसचे नेते अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे. याचसंदर्भात सीबीआयने जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात काल हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग आज मोकळा होणार आहे.