नागपूर – महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल पहिल्यांदाच अनिल देशमुखांची उघडपणे बाजू मांडली. अनिल देशमुख यांच्यासोबत जे झाले तो अन्याय आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांना तुम्ही तुरुंगात टाकले, परमबीर सिंग फरार आहेत. तुम्ही जे काही केले असेल त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल असा हल्लाबोल भाजपवर केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी नागपुरात मोठे विधान केले आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, असे पटेल यांनी म्हंटले आहे. ते नागपुरातील लकडगंज परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. पटेल यांच्या या विधानानंतर अनिल देशमुख पुन्हा गृहमंत्री होणार का? अशा चर्चाणा उधाण आले आहे.
शरद पवारांच्या आशिर्वादाने अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येतील, असा विश्वासही यावेळी प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. हे आपले मत नसून शरद पवार यांचे मत असल्याचे स्पष्टीकरण ही त्यांनी दिले. पटेल म्हणाले, ‘पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे अनिल भाऊ लवकरच आपल्या सोबत येतील. पवार साहेवांचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि आपल्याला लवकरात लवकर अनिल भाऊला परत त्यांच्या जागेवर बसवायचं आहे. हे पवार साहेबांचे विचार आहेत. माझ्या एकट्याचे नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणतीही पोकळी निर्माण झाली आहे, असे कोणाला वाटू नये.
शरद पवार काय म्हणाले?
“दोषारोप होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला व त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिलबाबू आत आहेत.”
“यातूनच दिल्लीच्या मदतीने इथलं राज्य कसं घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. त्याची सुरुवात म्हणून सरकारमधील नेत्यांचा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांचा वापर करून एकप्रकारे छळवाद करण्याचे काम सुरू आहे.”
“राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही.”
“देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.