नवी दिल्ली – ठरलेल्या वेळेत सर्वांची कर्जफेड करण्याची ग्वाही रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की आमच्या कंपनीने गेल्या 14 महिन्यात 34 हजार कोटी रूपयांची कर्जे फेडली आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की परिस्थिती अनुकुल नसताना आणि कोणतीही वित्तीय कंपनी आम्हाला मदत करण्याच्या तयारीत नसताना आम्ही 24 हजार 800 रूपयांचे कर्ज फेडले असून त्यावरील 10 हजार 600 कोटी रूपयांचे व्याजही अदा केले आहे.
आमच्या कंपनीविषयी नाहकच अफवा पसरवल्या जात असून त्याचा आमच्या कंपनीच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे असेही त्यांनी नमूद केले. या मुद्दामहून पसरवल्या जात असलेल्या नकारात्मक वातावरणामुळे गेल्या काही आठवड्यात कंपनीच्या शेअर्सही घसरण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. कंपनीकडे पुरेशी मालमत्ता असून त्यातून पैसा उभारणी केली जात आहे असे ते म्हणाले. काहीं प्रकरणात न्यायालयीन दिरंगाई होत असून त्यात कंपनीचे सुमारे तीस हजार रूपये अडकून पडले आहेत असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
कंपनीविषयी जाणिवपुर्वक तयार केली जात असलेली तिरस्काराची भावना आणि मदत करण्यास दाखवल्या जाणाऱ्या असमर्थतेमुळे कंपनीतील गुंतवणुकदारांच्या हितसंबंधांना बाधा येत आहे असे ते म्हणाले. आम्ही गेल्या 14 महिन्यात अशा वातावरणातही बॅंका, विमा कंपन्या, म्युच्युअल फंड, प्रॉव्हिडंट फंड अशा संस्थांचे तब्बल 35 हजार रूपये फेडले आहेत ही काही कमी महत्वाची बाब नाही असेही ते म्हणाले.