नगर – बोल्हेगाव नागापूरचा पाणी प्रश्न गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदने, बैठका घेतल्या. तसेच पाण्याच्या टाकीवरती जाऊन सूचनाही केल्या. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याने महिलांनी महापालिकेच्या दारात माठ फोडून प्रशासनाचा निषेध केला.
मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवार (दि.3) प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले, नागापूर, बोल्हेगावचा पाणी प्रश्न प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तीव्र स्वरूपाचा बनला आहे. आठ ते दहा दिवसापर्यंत पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रभागातील नागरिकांनी फेज टू पाणी योजनेचे कनेक्शन घेण्यासाठी पैसे भरले. मात्र त्यांना त्याद्वारे पाणी दिले जात नाही. आमच्या हक्काचे पाणी दिले नाही तर नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडू, असा इशारा आंदोलकांनी दिला.