पारनेर – पारनेर तालुक्यातील निघोज येथील कामगार तलाठी व मंडल अधिकारी वेळेवर निघोज कार्यालयात उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची कामे आडली जातात. यासाठी त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश वराळ यांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
वराळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, निघोज व परिसर मोठा आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते 5 यावेळेत कामगार तलाठी उपस्थित राहण्याची गरज आहे. वेळोवेळी या परिसरातील शेतकरी असो वा ग्रामस्थ यांना शासकीय कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी नियमीतपणे कामगार तलाठ्याची कायमस्वरूपी गरज असते. गेली दोन महिन्यापासून कामगार तलाठी विनायक निंबाळकर हे सातत्याने अनुपस्थित असतात.
त्यांना विचारणा केल्यावर आज कुठे पारनेरला बैठक, काल नगरला बैठक तर परवा मुंबईत तारीख असेच उत्तरे त्यांचकडून मिळतात. सातत्याने शेतकऱ्यांना बॅंकेची, सोसायटीची कर्जप्रकरणे किंवा कृषी खात्याच्या योजना किंवा सर्व ग्रामस्थांना दाखल्याची कामे असे नियमीत तलाठी कार्यालयाची गरज असते. मात्र कामगार तलाठी कधीच वेळेवर सापडत नाही.
यापेक्षा कुठे बैठक असेल तर संबधीत कामगार तलाठ्याने कार्यालयाबाहेर बोर्डवर आठवड्याचे वेळापत्रक लावून आलेल्या लोकांना माहिती होईल व हेलपाटा होणार नाही. याची काळजी घ्यावी. तसेच सध्या निघोज विभागाचा मंडलअधिकारी कोण आहे याची कुणालाच माहिती नाही. या दोघांची निघोज व परिसरातील जनतेला जास्त गरज असल्याने तहसीलदार चव्हाणके यांनी संबधीतांना निघोज कार्यालयात कायमस्वरूपी उपस्थित राहण्यासाठी सुचना द्यावी, असे निवेदन वराळ यांनी तहसीलदार यांना दिले आहे.