मुंढवा, दि. 29 (प्रतिनिधी) – मुळा-मुठा जुना नदीपुलावरील पदपथांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. घाणीमुळे व राडारोड्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. पुलावरच गेल्या महिनाभरापासून पाणी साचल्याने त्यात डेंग्यूच्या अळ्या दिसू लागल्या आहेत, त्यामुळे महापालिकेने हा नवा प्रकल्प हाती घेतला आहे काय? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
मुंढवा परिसरात गेल्या आठ-दहा वर्षात रस्तारुंदीकरणाची कामे पूर्ण झाली. भलेमोठे रस्ते झाले त्याचबरोबर नागरिकांनी पायी जाण्यासाठी पदपथांची निर्मितीही केली. नदीवरील जुना पूल मागील वर्षांपूर्वी दुरुस्त करण्यात आला. नवीन पदपथ तयार करण्यात आले. परंतु, मुंढव्याच्या दिशेने येणारे पदपथ अतिशय धोकादायक झाले आहेत. येथील पदपथाजवळ पावसाच्या पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. तेथेच राडारोडा टाकण्यात आला आहे. यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मात्र या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
स्वच्छता विभाग आहे कुठे?
मुंढवा-केशवनगर परिसरात अनेक भागात कचरा समस्या वाढली आहे. स्वच्छता विभागाचे कर्मचारी कुठे आहेत? असा सवाल नागरिक करीत आहेत. महानगरपालिकेकडून आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी यांच्यावर मोठा निधी खर्च केला जात असताना कर्मचारी काम करीत नसल्याचे उघड आहे, शिवाय अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मुंढवा-केशवनगर भागातील कचरा समस्येवर काही उपयोजना आहे का? असा सवाल सागर भंडारी यांनी केला आहे.