ऐन रणधुमाळीत परदेशी रवाना झाल्याची चर्चा
नवी दिल्ली: कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे राहुल गांधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातून ते महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसच्या प्रचारापासून दूर राहणार असल्याचे समजते. एवढेच नव्हे तर, ऐन रणधुमाळीत ते परदेशी रवाना झाल्याचीही जोरदार चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पक्षकार्यातून अंग काढून घेतल्याचेच मागील काही दिवसांपासूनचे चित्र आहे. त्यामुळे पक्षाच्या पराभवाने राहुल निराश झाले असल्याचे मानले गेले. मात्र, राहुल ज्येष्ठांवर नाराज असल्याचा दावा करणारे वृत्त आता पुढे आले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी असताना राहुल यांना हवे तसे सहकार्य काही ज्येष्ठ नेत्यांकडून मिळाले नाही. त्याशिवाय, राहुल यांना इच्छेप्रमाणे निर्णयही घेऊ दिले जात नव्हते, असे एका वाहिनीने संबंधित वृत्तात म्हटले आहे.
नाराजीपोटी राहुल यांनी स्वत:ला त्यांच्या केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित ठेवले आहे. वायनाडच्या दौऱ्यावर नियमितपणे जाणारे राहुल देशाच्या इतर भागांत सध्या फारसे फिरताना दिसत नाहीत. सध्या महाराष्ट्र आणि हरियाणातील राजकीय वातावरण विधानसभा निवडणुकांमुळे तापले आहे. त्या निवडणुकांसाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने दोन्ही राज्यांमधील स्टार प्रचारकांच्या याद्यांमध्ये राहुल यांच्या नावाचा समावेश केला आहे. मात्र, ते प्रचारात सहभागी होणार नसल्याचा दावाही संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. ते सध्या बॅंकॉकच्या दौऱ्यावर असल्याची चर्चा आहे. अर्थात, त्याबाबत कॉंग्रेसकडून काही सांगण्यात आलेले नाही.
राहुल ब्रिगेडमध्ये अस्वस्थता
कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना राहुल यांनी पक्षातील तरूण मंडळींना पुढे आणण्याचे प्रयत्न केले. ताज्या दमाच्या त्यांच्या समर्थकांकडे राहुल ब्रिगेड म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्या ब्रिगेडमध्ये आता अस्वस्थता पसरली आहे. राहुल यांचे निकटवर्तीय मानले गेलेले हरियाणा कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी पक्षाला रामराम ठोकल्याची घडामोड ताजी आहे. राहुल यांनी ताकद दिलेल्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप तंवर यांनी केला. तशाच आशयाचा आरोप मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनीही स्वतंत्रपणे केला.