अमरावती – त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत. कालपासून अमरावती शहरात सुरु असलेल्या जाळपोळ आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये 144 कलम लागू करण्यात आले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 144 कलम लागू असलेल्या परिसरात कोणत्याही हिंसक घटना घडवणाऱ्यांना पोलीस तात्काळ अटक करु शकतात.
आज सकाळी अमरावतीत मोठ्या संख्येच्या जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर शहरातील राजकमल चौक परिसरात एका टपरीलाही एका जमावाने आग लावली आहे. आग लावण्यापूर्वी या टपरीतील सामान काढून घेण्यात आले होते. मात्र, भर बाजारात या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट दिसून येत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्याकरिता पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला आहे. शहरातील काही ठिकाणी जमाव हिंसक झाला असला, तरीही उर्वरीत शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
काल शुक्रवारी अमरावतीसह नांदेड, मालेगावात त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला होता. यावेळीही बंदला हिंसक वळण लागले. कालपासून अमरावती शहरात प्रचंड तणाव आणि दशहतीचे वातावरण आहे. आज अमरावती मधील राजकमल चौकात मोठ्या संख्येने जमाव एकवटल्याचे दिसून आहे. यावेळी जमावाकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे.
शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस आणि पालकमंत्र्यांनी केले आहे. तरी देखील जमावाकडून हिंसक घटना घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्रिपुरा या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने केलेल्या जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आज देखील दिसत आहे.