नगर – खडीक्रेशरच्या धुळीच्या फुफाट्याने पिकांचे झालेले नुकसान, खडीक्रेशर व डांबर प्लांटच्या प्रदूषणाने धोक्यात आलेले आरोग्य, सुरुंगाच्या स्फोटाने खालवलेली पाणी पातळी व घरांना गेलेले तडे हे गंभीर प्रश्न सुटत नसल्याने नगर तालुक्यातील खंडाळा, अरणगाव तसेच शिंदेवाडी येथील शेतकऱ्यांनी खडाळा-अरणगावच्या शिवरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तर खडी घेऊन जाणाऱ्या गाड्या आडवून खडीक्रेशरचे काम बंद पाडले.
बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी हे आंदोलन केले. सुमारे तीन तास हे आंदोलन चालू होते. या आंदोलनात नारायण पवार, गोविंद लोटके, सतीश पवार, भाऊसाहेब साठे, जगन्नाथ शिंदे, विश्वनाथ खंडागळे, नवनाथ शिंदे, दगडू शिंदे, ललिता शिंदे, छबाबाई साठे, अशोक खंडागळे, बबन शिंदे आदी शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनासह सर्कल बी.जे. वाघमारे व अरणगाव तलाठी गावडा यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
शेतकऱ्यांनी लेखी आश्वासन मिळे पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. तसेच भाकपचे कॉ.ऍड.सुधीर टोकेकर व जि.प. सदस्य संदेश कार्ले यांनी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली. सर्कल व तलाठी यांनी संपुर्ण भागातील शेतीची पहाणी करुन पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे तर खडीक्रेशर चालकांनी मयुरी हॉटेल ते फटाका गोडाऊनचे दोन महिन्यात डांबरीकरण करण्याचे आणि पाणी टाकून क्रशिंग करण्यासह एका खाणीमध्ये एकाच वेळी स्फोट घडवून आणण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
नगर तालुक्यातील खंडाळा व अरणगाव शिवारात दगडखाणीसह 16 खडीक्रेशर व 4 डांबर प्लांट आहेत. खडीक्रशरच्या धुळीच्या फुफाट्याने व डांबर प्लांटच्या धुराने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या खडीक्रशर लगत असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, लावलेले पिकांची नासाडी झालेली आहे. या भागातील शेतकऱ्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून असून, या नुकसानीमुळे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन व खडीक्रशर चालकांनी सहकार्य करुन चांगल्या पध्दतीने शेती करु द्या अन्यथा फासावर लटकून आत्महत्या करु देण्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दगडखाणीत एकाच वेळी अनेक सुरुंग लावून मोठे स्फोट घडवून आणले जात आहे. सुरुंगाच्या धक्क्याने देखील ग्रामस्थ वैतागले असून, या भागातील पाणी पातळी देखील घटली आहे. धुळीच्या फुफाट्याचा त्रास वर्षभर असल्याने दोन्ही हंगामाच्या पिकांची नुकसान झाले आहे. शेतीत काम करताना देखील धुळीच्या प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. खडीक्रशर चालक धनदांडगे असल्याने त्यांच्या विरोधात आवाज उठविल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.