नारायणगाव – पुणे-नाशिक महामार्गावरील खोडद बायपास चौकात उड्डाणपूल बांधण्यात न आल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. या ठिकाणी पूल बांधण्यात यावा व आमदार, खासदार (दि.4) डिसेंबरपर्यंत येथे येऊन भेट देत नाही. तोपर्यंत हा बायपास बंद ठेवावा, अशी आक्रमक झालेल्या नागरिकांनी मागणी केली. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचा अंत्यविधी या चौकात करणार, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कल्पना योगेश भोर (वय 28, रा. हिवरेतर्फे नारायणगाव), असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्रकाश अबाजी भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश किसन भोर व त्यांची पत्नी कल्पना हे मंगळवार (दि.23) योगेशची बहीण संगीता कोरडे हिला दवाखान्यातून घेऊन येत होते. पुणे-नाशिक महामार्गावर बायपासला चौकात स्विफ्ट डिझायर गाडीने भरधाव वेगात त्यांना उडवले. घटनेत योगेश, पत्नी कल्पना व बहीण संगीता हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान कल्पना यांचा (दि.26) मृत्यू झाला. बायपासला खोडद चौकामध्ये उड्डाणपूल बांधण्यात यावा , अशी मागणी वेळोवेळी खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको करून महिलेचा अंत्यविधी चौकातच करण्यासाठी रास्ता रोको केला.
तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राष्ट्रवादीचे नेते अमित बेनके, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे, सूरज वाजगे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत यावर कुठलाच निर्णय झाला नाही.
संतप्त नागरिकांनी या ठिकाणी उड्डाणपूल न झाल्यास वारंवार अपघात होऊन जीव जाणार आहेत. त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
या ठिकाणी स्पीड ब्रेकर असूनही वाहने वेगाने जातात. या चौकात दिवे नाहीत, शाळा सुरू झाल्यामुले शाळकरी मुलाच्या जाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. उड्डाणपुलाची मागणी होती. मात्र, ती मंजूर झाली नाही. त्यामुळे आमदार व खासदार जोपर्यंत येत नाही. तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली
“दुर्दैवाने मृत्यू झालेल्या या बहिणीच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सामील आहे. बायपासवरील खोडद चौकांमध्ये फेज 3 च्या बांधकामात उड्डाणपूल करावा, या मागणीचा प्रस्ताव मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवला आहे. (दि.30) रोजी त्यांच्याबरोबर माझी बैठक आहे. त्यावर लवकर निर्णय घेण्याबाबत चर्चा करणार आहे. सध्या परिस्थिती सुधारण्यासाठी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना लगेचच चौकात हायमॅक्स बसवून वाहतुकीसंदर्भात योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.”
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार.
“बायपासला खोडद चौकात उड्डाणपूल करण्याऐवजी दुचाकी वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्यात यावा, ही भूमिका आमची पहिली होती. आत्ताही आहे. कारण चौकात दुचाकी गाड्याचे अपघात होतात. त्यामुळे राजकारण न करता नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर मार्ग काढावा.”
-बाबू ऊर्फ योगेश पाटे, सरपंच, नारायणगाव.