Andhra Pradesh: राज्यातील घटता जन्मदर रोखण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने मोठी घोषणा केली असून, तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी पालकांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसण्णपेटा येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. चौथ्या मुलासाठी ४० हजार – नायडू यांच्या घोषणेनुसार, तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पालकांना ३० हजार रुपयांचा तर चौथ्या मुलासाठी ४० हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. या योजनेचे सविस्तर नियम आणि अटी पुढील महिनाभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्वर्ण आंध्र’ आणि ‘स्वच्छ आंध्र’ कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले, “राज्यातील जन्मदर सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे लोकसंख्या संतुलित ठेवण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे. तिसऱ्या मुलासाठी ३० हजार आणि चौथ्यासाठी ४० हजार रुपये देण्याचा निर्णय योग्यच आहे.” दुसऱ्या अपत्यासाठी २५ हजार – काही वर्षांपूर्वी लोकसंख्या नियंत्रणाचे समर्थन करणाऱ्या नायडूंनी आता बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. अनेक कुटुंबे एकाच मुलावर समाधान मानत असून, काही ठिकाणी पहिली मुलगी असल्यासच दुसऱ्या अपत्याचा विचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही राज्य सरकारने दुसऱ्या अपत्यासाठी २५ हजार रुपयांच्या प्रोत्साहन भत्त्याचा विचार सुरू असल्याची माहिती विधानसभेत दिली होती. ५ मार्च रोजी नायडूंनी यासंदर्भात संकेत दिले होते. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी एकूण प्रजनन दर २.१ कायम राहणे आवश्यक असल्याचे सांगताना नायडू म्हणाले, “प्रजनन दर घटत राहिल्यास भविष्यात वृद्ध लोकसंख्या वाढेल आणि त्याचा आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो.”