मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख उद्या सोमवार 17 ऑक्टोबर आहे. याआधी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. या पत्रावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले, या लोकशाहीत पत्र लिहिण्याचा, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आमचं गोल आमचा उमेदवार निवडून येणं आहे. तो उमेदवारी अर्ज आम्ही भरला आहे. तेथील जनता आमच्या उमेदवाराला निवडून देईन. तसेच उमेदवारी अर्जावर काय निर्णय घ्यायचा हे पक्ष नेतृत्व ठरवेल, असे दरेकर म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी विधानसभेच्या जागेसाठी पोट-निवडणूक जाहीर झाली. त्याठिकाणी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा-प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरु झाली.
Andheri By-Election: मुरजी पटेलांचं आमदार होण्याचं स्वप्न अधुरं राहणार? फडणवीसांनी राज ठाकरेंच्या पत्रावर दिली “ही’ प्रतिक्रिया https://t.co/xqR3iWelgz
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2022
त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने कै. रमेश लटके यांच्या आत्म्यास खकरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भाजपने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणुक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं माझं मन सांगते. असं करण हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल. , असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
दरम्यान, या पत्रावर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हंटले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अंधेरी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे समर्थन करण्याची विनंती केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मला पत्र लिहिले आहे की, भाजप उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा. पण भाजपमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, त्यांच्या पत्रावर विचार कण्यासाठी मला सहकाऱ्यांशी आणि पक्षात चर्चा करावी लागेल. कारण आम्ही उमेदवार घोषित केला आहे आणि अर्ज देखील दाखल केला आहे.
आम्हाला याआधी जेव्हा योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तेव्हा अशी भूमिका घेतली होती. आरआर पाटील यांच्या वेळी तशी भूमिका घेतली होती. आता विधानपरिषदेच्या दोन जागांसाठीही घेतली होती. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यामुळे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करावी लागले. सगळी चर्चा झाल्यानंतरच यापत्राबाबत प्रतिक्रिया देता येईल. त्यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठवलेले आहे. आम्ही जरूर याचा गांभीर्याने विचार करू. पण सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, येत्या 3 नोव्हेंबरला अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सध्याच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके विजयी झाले होते. त्यावेळीही त्यांच्या विरोधात मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती. रमेश लटके यांचे अकाली निधन झाल्यामुळे येथील जागा रिक्त झाली होती.