सातारा -आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या अंधारी गावाला समुपदेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सातारा पोलीस दलाने त्या विचारांपासून बाजूला काढले. त्यामुळे या गावांने सामाजिक बहिष्काराला मूठमाती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कास तलावापासून पुढे तीन किलोमीटर अंतरावर बामणोली जलाशयाच्या जवळ वसलेले अंधारी हे शंभर घरांचे गाव. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात गेल्या काही वर्षांमध्ये दहापेक्षा अधिक आंतरजातीय विवाह झाले आहेत. यामधील बरीचशी मुंबई येथे राहणारी जोडपी टाळेबंदीच्या कालखंडात गावी परत आली. आंतरजातीय विवाह केल्याने गावकीने त्याच्याशी वेगळेपणाची वागणूक सुरु केली होती.
गावाच्या सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमात त्यांना सहभागी होऊ न देणे तसेच जवळच्या नातेवाईकांचे लग्न, मृत्यू यामध्ये त्यांना सहभागी होऊ न देणे असे प्रकार घडू लागले होते. काही ठिकाणी वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला धार्मिक कार्यात सहभाग नाकारण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकार देखील समोर आले होते.
गावातील आंतरजातीय विवाह केलेले आणि त्यासाठी शासनाचा सन्मान मिळालेले चंद्रकांत शेलार यांनी सामाजिक बहिष्कार कायद्याविषयी वाचले होते. अशा स्वरूपाचा सामाजिक बहिष्कार घालणे हा सामाजिक स्वरूपाचा गुन्हा आहे, असे त्यांनी गावकऱ्यांच्या निदर्शनास आणूनदेखील काही फरक पडत नव्हता.
शेवटी त्यांनी याविषयी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा शाखेकडेदेखील तक्रार केली. गुन्ह्याचे सामाजिक स्वरूप लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, शंकर कणसे, भगवान रणदिवे आणि प्रशांत जाधव यांनी याविषयी गावकऱ्यांशी बैठक घेऊन त्यांना शासनाने केलेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तुमच्या गावात इतके आंतरजातीय विवाह झाले आहेत, ही गावासाठी भूषणाची गोष्ट असल्याचे ध्यानात आणून दिले.
आपला देश संविधानाच्या कायद्याने चालतो. तो सोडून गावाचा वेगळा कोणताही कायदा अशा प्रकारे चालू शकत नाही. याविषयी प्रबोधन करून गावाचे सरपंच शेलार यांना समितीतर्फे संविधानाची प्रत भेट देण्यात आली. आंतरजातीय विवाह केलेल्या सहा जोडप्यांनी यावेळी त्यांना आलेल्या सामाजिक भेदभावाच्या वागणुकीविषयीचे अनुभव सांगितले.
गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सरपंचांनी पुढाकार घेऊन येथून पुढे अशा घटना गावात होणार नाहीत याविषयी निर्धार व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील विशेष करून जावळी आणि पाटण तालुक्यांतील अनेक गावांमध्ये गावकी आणि भावकीच्या नावाखाली सामाजिक बहिष्कार टाकला जात आहे, अशा पीडित लोकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, अशी आवाहन करण्यात आले आहे.