आंदोलनाला यश : शेतकरी सुखावले
केंदुर (प्रतिनिधी) – गेल्या एक महिन्यापासून चासकमानच्या कोरेगाव- धानोरे शाखेला पाणी सोडण्यात यावे म्हणून शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता, मात्र पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले प्रसंगी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले मात्र आज दि. २१ रोजी सकाळी १० वाजता कोरेगाव- धानोरे शाखेला पाणी सोडण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले आहेत.
शिरूर तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात चासकमान धरणाच्या पाण्यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला या प्रकरणात खुद्द जलसंपदा मंत्र्यांना दखल घ्यावी लागली होती. पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडत आहेत त्यामुळे कोरेगाव -धानोरे शाखेला पाणी देण्यास हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला होता. दरम्यान पाणी मिळत नसल्याने जातेगाव खुर्द, पिंपळे जगताप शिक्रापूरच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन दि. ६ मे रोजी चक्री उपोषण सुरू केले होते.
दुसऱ्या दिवशी हे उपोषण मोडीत काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी दि. १० रोजी पाणी देऊ असं खोटे आश्वासन देऊन उपोषण गुंडाळले होते. त्यानंतर सांगितलेल्या दिवशी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि चारीचे स्वतः दरवाजे उघडून पाणी सुरू केले होते.
त्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, उपनिरीक्षक राजेश माळी, किरण भालेकर, प्रवीण साळुंखे त्याचबरोबर ब्रम्हा पोवार यांनी पाटबंधारे च्या अधिकारी आणि शेतकरी त्यांच्यात समन्वय घडवून आणत या प्रकरणात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला शिवाय दि. २१ रोजी पाणी देण्याचे अधिकाऱ्यांकडून आश्वासन घेऊन शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर शेतकाऱ्यांनी दि. २१ पर्यंत पाण्याची वाट पाहण्याची तयारी दर्शवली मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६५ शेतकऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागावर नाराजी व्यक्त करत भविष्यातील या प्रकारचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू केला आहे, त्यासाठी ऍड. दिग्विजय पलांडे हे न्यायालयात या शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळेपर्यंत बाजू मांडणार आहेत.
दरम्यान या आंदोलनाला जरी यश आलं असलं तरी हक्काचं पाणी मिळेपर्यंत न्यायालयात आम्ही लढा देणार असल्याचं मुख्य आंदोलक समाधान डोके यांनी सांगितले. या चारीला पाणी आल्याने जातेगाव, शिक्रापूर, पिंपळे जगताप, करंदी परिसरातील शेतकऱ्यांची शेताला पाणी देण्यासाठी आता लगबग सुरू झाली आहे. या भागात दोन दिवस पिकांना काही प्रमाणात दिलासादायक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले होते त्यानंतर आंदोलनाला यश आल्याने चारीला पाणी पाहून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
तब्बल ६० दिवसांनी चारीला पाणी…
या भागातील शेतकऱ्यांना तब्बल ६० दिवसांनी पाणी मिळाल्याने आनंद होतोय मात्र येथील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी सोन्यासारख्या जमिनी दिल्या तरी देखील हक्काच्या पाण्यासाठी उपोषण, आंदोलन करावे लागते अधिकारी राजकिय दबावाला बळी पडतात आणि हक्काच्या पाण्यासाठी लढावं लागत ही दुर्दैवी बाब असल्याच्या भावना येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.