नगर – कापूरवाडी तलावातील गाळ काढल्याने तलावातील पाणीसाठा आता वाढणार आहे. तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी अधिक काळ टिकण्यासाठी मदत होणार असून परिसरातील शेतीलाही तलावाच्या पाझराचा फायदा होणार आहे. मिलिटरीतर्फे हा गाळ काढण्यात आला आहे.
कापूरवाडी तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. काही काळापूर्वी या तलावाने नगर शहराची खापरी नळाद्वारे तहान भागविलेली आहे. मात्र आज या तलावामध्ये परिसरातील पावसाचे पाणी वाहत येत असताना त्याबरोबर माती वाहत येऊन, तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचून तलाव उथळ झाला होता. तलावाची साठवण क्षमता घटली होती.
त्याचबरोबर तलावाचा भराव काही वर्षांपासून खचून या भरावाला पाण्याचा पाझर सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक तसेच या ठिकाणी येणारे पर्यटक तलावाच्या फुटण्याची चिंता व्यक्त करीत असत. मात्र हा तलाव लष्कराच्या ताब्यात असल्याने गाळ काढणे आणि स्वच्छतेचे काम करण्यात स्थानिक प्रशासनाला अडचणी येत होत्या. हा तलाव अनेक दिवसांपासून प्रभावाखाली येणाऱ्या मानवी वस्तीसाठी धोक्याची घंटा बनला होता.
बुऱ्हाणनगर, वारूळवाडी, कापूरवाडी या भागातील पावसाचे पाणी या तलावामध्ये येऊन धडकते. त्यामुळे पाण्याची आवक अधिक प्रमाणावर होते. कापूरवाडी तलावाचा भराव मागील काही वर्षांपासून अधिकच खचला गेला होता.
त्यामुळे तलावाच्या भरावाच्या बाजूला असणारी मानवी वस्तीला याचा धोका होता. पावसाळ्यामध्ये या तलाव प्रभाव क्षेत्रातील नागरीक जीव मुठीत घेऊन राहतात. मात्र यंदा लष्कराने तलावाचे साठवण क्षमता आणि तलावाचे वय याचा विचार करून त्याची मलमपट्टी करण्याचा विचार केला. याच पार्श्वभूमीवर लष्कराने तलावातील गाळ काढून तोच गाळ तलावाच्या भरावावर टाकला. त्यामुळे भरावाची ताकत वाढण्यास फायदा होणार आहे. तलावाची मलमपट्टी केल्यामुळे परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिक पाणी साठवण क्षमता झाल्याने पुढील आठ महिने पाणी राहिल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हा तलाव येणाऱ्या पावसाळ्यातील पाणी अडविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. तलावात ब्राह्मणी बदक, तलवार बदक, पाणडुबी, वारकरी, वैष्णव, फ्लेमिंगो, चित्रबलाक, पांढ-या मानेचा करकोचा, वेडा राघू, तांबट, खंड्या, मुनिया, पाकोळी, कोतवाल, पाणकोंबड्या आदी पक्ष्यांचा मेळावाच या तलावांच्या किनारी भरत असतो. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे तलावातील पाणीसाठा घटला. यामुळे विदेशातून येणा-या पाहुण्यांची संख्याही घटली. मात्र तलावातील गाळ निघाल्याने पाणी दिर्घकाळ टिकेल आणि देशी-विदेशी पक्षी याठिकाणी भेट देतील.