करोना नसलेल्या मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी “वैकुंठ’मध्ये वेटिंग
पालकमंत्री अजित पवारांनीही घेतली दखल; चौकशीचे आदेश
पुणे – करोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराला खूप वेळ लागतो, ही वस्तुस्थिती आहे. पण, कोविड नसलेल्या नैसर्गिक मृत्यू पावलेल्या मृतदेहांचेही वैकुंठात अक्षरश: हाल सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी तीन-तीन तास “वेटिंग’ करावे लागत आहे. त्यातून दोनच विद्युत दाहिनी सुरू असल्याने आणि पत्र्याच्या शेडमध्येही एका दिवशी एकच मृतदेहाचे दहन करता येत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. याविषयीची दखल थेट पालकमंत्र्यांनी घेतली असून, नेमकी समस्या काय आहे याची चौकशी करा, असे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी येरवडा आणि कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी राखीव ठेवण्यात आले आहेत. तेथेही शव ठेवण्यासाठी शीतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, अन्य स्मशानभूमींवर “वेटिंग’ प्रकार सुरू झाला असून, त्यातील वैकुंठ स्मशानभूमीत तर एका मृतदेहाच्या विद्युतदाहिनीतील अंत्यसंस्कारासाठी तीन तास वाट पहावी लागत आहे. करोनामुळे अंत्यसंस्काराला 20 च आप्तांना जाता येणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा जास्त जणांना जाता येत नाही. एकावेळी दहा जण “वेटिंग’ला असतील तर दहा जणांबरोबर आलेल्यांची संख्या ही दोनशे होते. अशावेळी तेथे दोनशे जणांची उपस्थिती ही करोनाला आमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे तेथे जीव टांगणीला लावूनच नातेवाईक बसलेले दिसतात. याशिवाय लाकूड, गवऱ्यांच्या सरणावर जे अंत्यसंस्कार केले जातात, त्याचे चार शेड आहेत. तेथे दिवसातून केवळ चारच अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. याविषयीची तक्रार पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल त्यांनी घेतली आणि “नेमकी समस्या काय आहे याची चौकशी करा,’ असे आदेश दिले आहेत.
देखभाल दुरुस्तीसाठी एक विद्युत दाहिनी बंद ठेवावी लागते. समजा, तीनमधील एखादी बंद पडली तर “इमर्जन्सी’ म्हणून तिसरी दाहिनी वापरता येते. वैकुंठात “वेटिंग’ आहे ही वस्तुस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी तीन पैकी एक दाहिनी बंद पडली होती. त्यावेळी हा “वेटिंग’चा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी काहींना कोथरूड तर काहींची बिबवेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था लगेचच करण्यात आली. कैलास आणि येरवड्यामध्ये करोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने, त्या परिसरातील मृतदेहही वैकुंठात येण्याचे प्रमाण वाढल्याने येथील “वेटिंग’ वाढले आहे. या स्मशानभूमीत वाढलेला अंत्यसंस्काराचा ताण पाहता, आणखी एक विद्युत दाहिनी घेणार असून, दोन दिवसांत त्याची निविदा प्रसिद्ध होणार आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी आला आहे, तो या विद्युतदाहिनी खरेदीसाठी खर्च केला जाणार आहे.
– श्रीनिवास कंदूल, विद्युत विभागप्रमुख, मनपा