प्रकाश आंबेडकरांचा आरोप ः नागरीकत्व कायदा 40 टक्के हिंदूच्या विरोधात
मुंबई : सुधारीत नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि नागरीक लोकसंख्या नोंदणी… असे एकेक कायदे करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या सरकारने या देशात अराजक माजवण्याचा कट रचला आहे.
संघ हा मुसलमानांच्या विरोधात असून हा कायदा केवळ मुसलमानांच्याच नव्हे, तर 40 टक्के हिंदूच्यांही विरोधात आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत.
बाप कुठं मेला? आजोबा कुठं मेला? हेही अनेकांना माहीत नसताना त्यांच्याकडून नागरिकत्वाचे पुरावे कसले मागता, असा सवाल करीत डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर हे सरकार पाडा,’ असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.
सुधारीत नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील खोदादाद सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नसतानाही आंबेडकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी व केंद्रिय गृहमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. एनआरसीबाबत जाहिरपणे बोललो नाही, तसेच संसदेतही त्याबाबत चर्चा झाली नाही, असे पंतप्रधान म्हणत असतील तर मग केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी आम्ही देशात एनआरसी लागू करणार हे विधान कसे केले, असा संतप्त करतानाच पंतप्रधानांच्या परवानगिशिवाय शाह यांनी हे विधान केले असेल तर आपण त्यांचा राजीनामा घेणार का, असे थेट आव्हान त्यांनी मोदींना दिले.
शाह यांचा राजीनामा घेतला नाही तर 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी 15 लाख तुमच्या खात्यामध्ये येईल, अशी भूलथाप दिली त्याचपद्धतीने तुम्ही खोटे बोलताहेत हे सिद्ध होईल, अशी टिकाही आंबेडकर यांनी केली.
सरकारने आणलेली डिटेन्शन कॅम्पची पद्धत ही ब्रिटीशांनी आणलेली पद्धत आहे. 1157 साली ब्रिटीशांनी गुन्हेगारी जमात कायदा केला.
त्यावेळी त्यांनी ज्या जमातींना गुन्हेगार ठरवलं, त्या जमातींना डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. जवळपास 75 वर्षे ते डिटेन्शन कॅम्पमध्ये होते. त्यांना त्यांचे गाव माहित नाही. त्यांना कुटुंब माहित नाही. या डिटेंन्शनमध्ये काही जन्माले आले तर अनेक जण मेली. ही संख्या 16 टक्के महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे आंबेडकर म्हणाले.
या देशाच्या व्यवस्थेने शिक्षणाची दारे बंद केली. त्यामुळे आजही महाराष्ट्राच्या रस्त्यावर फिरताना अनेक जमाती दिसतात. आजही देशातील अनेकांचे संसार गाढवाच्या पाठीवर आहेत. त्यांच्याकडं कसलेही पुरावे नाहीत. बाप कुठं मेला? आजोबा कुठं मेला? हेही अनेकांना माहीत नाही.
त्यांच्याकडून नागरिकत्वाचे पुरावे मागितले जाणार आहेत. हा अन्याय आहे. त्यामुळे डिटेन्शन कॅम्पमध्ये जायचं नसेल तर या सरकारविरोधात आवाज उठवा. हे सरकार पाडा,’ असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले.
… तर मला अटक करून दाखवा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने पंतप्रधानांच्या कटाच्या चौकडीमध्ये प्रकाश आंबेडकर आहेत असा आरोप केला. पण हिंमत असेल तर अटक करून दाखवा, असे आव्हान देतानाच या देशातले खरे राजे आपण मतदार आहोत. पाच वर्षांसाठी आपण यांना निवडून देतो. पण लायसन्स रिनिव्ह करायला पाच वर्षांनी येतील तेव्हा धोबीपछाड दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.