नवी दिल्ली : उन्हाळ्यात उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. केरळ आणि लक्षद्वीप पुढील येत्या पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. येत्या दोन दिवसात हे वारे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.
केरळ किनारपट्टी भागातील मच्छिमारांना अरबी समुद्रात 16 मेपर्यंत न जाण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर केरळ प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांकडूनही खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. आपात्कालीन यंत्रणादेखील सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे. मान्सूनची सुरूवात केरळपासून होते आणि नंतर तो हळूहळू देशभर पसरतो. त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून पडतो. भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत.