प्रकाश राजेघाटगे
बुध – लहानपणी गावोगाव भटकंती करून “गारेगार’ विकणारे आणि नंतर उदरनिर्वाहासाठी वाजंत्रीचे काम करणारे आनंदराव भोंडवे यांना खटाव तालुका पंचायत समितीच्या उपसभापतिपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आनंदराव यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून या पदाच्या रूपाने पाठबळ मिळाले आहे. आता पुढीला काळात खटावसारख्या दुष्काळी भागातील लोकांना दिलासा देण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत.
खटाव तालुक्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे. अशा कठीण परिस्थितीत जगण्याचे आव्हान स्वीकारून याच मातीत संघर्ष करून आपल्या पोटाची खळगी भरणारे आनंदराव भोंडवे यांच्यासारखी कुटुंबे फारच थोडी असतात. गावकी व्यवहार बंद झाल्यानंतर या आनंदरावांनी जगण्याच्या संघर्षात वाजंत्री वाजविण्याची भूमिका पार पाडत उदरनिर्वाहाचे साधन निवडले. “अमोल बॅंड” च्या माध्यमातून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात वाजंत्रीसाठी ते प्रसिद्ध झाले. लोकांची तहान भागविण्यासाठी लहानपणी “गारेगार” विकणारे आनंदराव भविष्यात तालुक्यातील पंचायत समितीचा उपसभापती होईल, असे कुणालाही वाटले नाही.
पण शरद पवार यांच्या सामाजिक समीकरणातून आनंदराव यांना राजकारणात संधी मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून आनंदराव भोंडवे यांच्यासारख्या मातंग समाजातील व्यक्तीला पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि “अमोल बॅंड’च्या माध्यमातून केलेली सेवा भोंडवेच्या कामी आली. लोकांच्या लग्नात ढोल वाजवणारा हा ढोली पंचायत समिती सदस्य झाला. आपल्या कामातून समाजाचे ऋण फेडणारे हे व्यक्तीमत्व फारच थोड्या जणांच्या लक्षात राहिले. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
म्हणून अडीच वर्षांनंतर ज्यावेळी उपसभापती निवडीचा विषय आला तेव्हा निढळ या गावच्या सुपुत्राचे नांव पहिल्या क्रमांकाने घेतले गेले. उपसभापतिपदासाठी कुठलेही आरक्षण नसताना आनंदराव या पदावर विराजमान झाले. वाजंत्री वाजविणारे आणि गारेगार विकणारे आनंदराव उपसभापती झाले. तळागाळातील लोकांशी असणारे त्यांचे संबंध लक्षात घेता या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी किती होणार, हे नंतरच समजणार आहे.