मुंबई – आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाऊन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, लॉकडाऊन लागू न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमचे आभार. सतत नवनव्या संघर्षांना सामोरे जाणाऱ्या छोट्या दुकानदारांबद्दल मला नेहमी वाईट वाटत राहते. आता करोना नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे जेणेकरून ही बंधने लवकरात लवकर हटवली जातील. हे ट्विट करताना आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे.
याआधी आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करत लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. या ट्विटमध्ये त्यांनी लॉकडाऊनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले होते की, “उद्धवजी, या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान गरीब, स्थलांतरित मजूर आणि छोट्या उद्योजकांचे होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत मृतांचे प्रमाण कमी करण्यावर भर देऊयात.’
यानंतर आनंद महिंद्रांच्या ट्विटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावत म्हटले होते की, मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत.
गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. आज आनंद महिंद्रा यांच्या ट्विटमुळे गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला.
Thank you @CMOMaharashtra for not imposing a total lockdown. My heart goes out to shop owners who face continuing hardship. It’s now our responsibility to strictly follow Covid protocols so that these restrictions can be lifted sooner rather than later https://t.co/aphiwobiRy
— anand mahindra (@anandmahindra) April 5, 2021