मुंबई – शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले.त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अशात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे.
शिवसेनमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र आनंद दिघेंचे नातू केदार दिघे हे उद्धव ठाकरेंसोबतचं असल्याचे दिसून येते. नुकतंच केदार दिघे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या काळात ‘मला सांभाळला उद्धवला सांभाळा.. आदित्यला सांभाळा अशी मागणी शिवसैनिकांकडे का केली होती याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.
काय म्हटलंय केदार दिघे यांनी आपल्या पोस्टमध्ये
“शिवसैनिकांना का म्हणाले होते बाळासाहेब… जसं मला सांभाळले तसं उद्धव आणि आदित्य ला सांभाळा… याच उत्तर आज मिळालं! त्यांनी शेवटचा आदेश शिवसैनिकांना दिला,आमदार खासदार यांना हा आदेश का नाही दिला..? याच उत्तर आज मिळालं.दैवी पुरुष असणाऱ्या बाळासाहेबांना माहीत होतं… आपल्या पाठीमागे आपलेच काही गद्दार आमदार आणि नेते हे सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एकटे पाडतील…
त्यांना माहीत होतं शिवसेना हा पक्ष भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होईल तेव्हा उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडलं जाईल…शिवसेनेच्या जोरावर पैसा कमावलेले ,ठेकेदार झालेले आमदार,नगरसेवक स्वतःला पक्षा पेक्षा मोठं समजतील…घरातील माणसं देखील विरोधात जातील.. कारण,शिवसेना हा विचार पुढे नेताना दिल्ली समोर झुकायचे नाही ही शिकवण फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे हेच पाळताना दिसत होते… शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजप आहे.त्यांचा सेनेच्या मतांवर डोळा आहे.काँग्रेस राष्ट्रवादी हे शिवसेनेची मते घेऊ शकत नाहीत ती हिंदुत्ववादी मते फोडण्याचे काम भाजप करेल…म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घालत शिवसैनिकांवर जबाबदारी टाकली होती…उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना साथ दया…! ते असं म्हणाले नाहीत आमदारांना साथ दया…ते असं म्हणाले नाहीत भाजपला साथ द्या ! त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत राहण्याची ही जबाबदारी आमदार आणि नेत्यांवर दिली नाही तर ही जबाबदारी त्यांनी सामान्य शिवसैनिकांवर दिली…
आज बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा आदेश पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. चला संपूर्ण देशाला आणि बीजेपीला दाखवून देऊया…हा मराठी माणूस,बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा आदेश पाळतो…भलेही नेते गेले…,भाजपने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असेल…पण शिवसैनिक मातोश्री सोबत प्रामाणिक राहील आणि या गद्दारांना त्यांची जागा दाखवेल! काही झालं तरी बाळासाहेबांचा शेवटचा शब्द पडू द्यायचा नाही, शेवटचा आदेश तंतोतंत पाळायचा ही जबाबदारी आपली शिवसैनिकांची आहे !” अशी पोस्ट केदार दिघे यांनी केली आहे.