औरंगाबाद : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच ब्लॅक फंगसचे संकट गडद होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील राज्यात औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिसचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. म्युकरमायकोसिसने आतापर्यंत या शहरात 53 जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर म्युकरसायकोसिस रुग्णांची संख्याही तब्बल पावणे सहाशेवर जाऊन पोहोचली .
खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु आता म्युकरमायकोसिसचा घट्ट विळखा पाहता औरंगाबादमधील नागरिकांच्या पुन्हा चिंता वाढल्या आहेत. त्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उचपार करणाऱ्यासाठी लागणारी इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.
औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचे 399 रुग्ण असल्याची माहिती गुरुवारी देण्यात आली होती. परंतु एकाच दिवसात तब्बल 177 रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 576 वर गेली. आता ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.