नवी दिल्ली : भारतात चालू वर्षी शांघाय सहकार्य संघटनेचे (एससीओ) सदस्य असणाऱ्या देशांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. त्या बैठकीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही भारताकडून निमंत्रण दिले जाणार आहे.
एससीओची स्थापना 2001 मध्ये झाली.
त्यावेळी त्या संघटनेच्या सदस्यांमध्ये चीन, रशिया, किरगिझ प्रजासत्ताक, कझाकस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश होता. चीनचा प्रभाव असणाऱ्या त्या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व भारत आणि पाकिस्तानला 2017 मध्ये मिळाले.
आता भारत पहिल्यांदाच एससीओच्या वार्षिक बैठकीचा यजमान बनणार आहे. यजमान या नात्याने भारताला इतर सदस्य देशांच्या प्रमुखांप्रमाणेच इम्रान यांनाही निमंत्रण द्यावे लागणार आहे. त्या बाबीला भारताकडून दुजोराही देण्यात आला आहे. भारताने मागील वर्षी धडक पाऊल उचलताना जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला.
त्यामुळे काश्मीरवर वक्रदृष्टी ठेवणारा पाकिस्तान अस्वस्थ झाला. त्यातून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. आता भारताचे निमंत्रण इम्रान स्वीकारणार का आणि दोन्ही देशांमधील संबंध सुरळित होणार का हे आगामी काळात समजू शकेल.