नवी दिल्ली : दिल्लीच्या चांदबाग भागात केलेल्या दगडफेकीत गुप्तचर खात्याच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ड्रेनेजमध्ये टाकण्यात अला होता, असा दावा त्याच्या काकांनी केला आहे. मृत अधिकारी 26 वर्षाचा होता.
अंकीत शर्मा असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. सुधारीत नागरिकत्व कायद्यावरून सुरू झालेल्या हिंसाचारात आता पर्यंत 20 जणांचे प्राण गेले आहेत. दरम्यान दिल्लीची परिस्थिती धोकादायक पातळीवर असून केंद्राने लष्कर पाचारण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. याबाबत आपण केंद्र सरकारला पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोनीया गांधी यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी या दंगलीवरून केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारवर टीका केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
ईशान्य दिल्लीत जाफराबाद, मौजपूर आणि अन्य भागात शनिवारी का कायद्या विरोधात निदर्शने सुरू केली. मात्र रविवारी का समर्थक आणि विरोधक आमने सामने ठाकले. नंग्या तलवारी आणि बंदुका घेऊन खुलेआमपणे फिरत होते. अनेक घरे आणि वाहने पेटवून देण्यात आली. या हिंसाचारात सुमारे 250 जण जखमी झाले आहेत.