सातारा – शेअर बाजारात पैसे गुंतविण्याच्या आमिषाने विमा एजंट गौरांग मोहन शिंदे (वय 46, रा. यशवंतनगर, शाहूपुरी, सातारा) यांची पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात व्यंकटेश विश्राम तानावडे (रा. राजापूर भटाळी, जि. रत्नागिरी) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, तानावडे याच्याकडून अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गौरांग शिंदे यांची व्यंकटेश तानावडे याच्याशी 2017 साली एका मध्यस्थाकरवी ओळख झाली होती. त्याने रिलायन्स सिक्युरीटीजचिे काम करत असल्याचे शिंदे यांना सांगितले होते.
आपल्याकडे शेअर बाजारत गुंतवणूक करण्यासाठी रिलायन्सची फ्रॅंचायजी राजापूर, ता. रत्नागिरी येथे असून गेल्या दहा वर्षांत सहाशे ग्राहक असल्याचे सांगितले. त्या ग्राहकांना गुंतवणुकीवर नियमित परतावा दिला आहे. तुम्हीही पाच लाच रुपये गुंतवणूक केल्यास वेळच्या वेळी परतावा देईन. एक वर्षानंतर मूळ रक्कम परत दिली जाईल, असे तानावडेने सांगितले.
मध्यस्थ जुबेर शेख यांनीही तीन लाख रुपये गुंतवले होते. त्यांना नियमित परतावा मिळत होता. शेख हे तानावडेला सहा वर्षांपासून ओळखत होते. त्यामुळे गौरांग शिंदे यांनीही तानावडेकडे पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन वडिलांच्या नावे गुंतवणूक केली. त्यानंतर दोन महिने 8500 रुपये परतावा मिळाला; परंतु नंतर परतावा मिळाला नसल्याने शिंदे यांनी व्यंकटेशला त्यांनी फोन केला.
त्याचा फोन न लागल्याने शिंदे हे अन्य गुंतवणूकदारांसमवेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे गेले. तेथे व्यंकटेश सापडला नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी सातारा येथे येऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तानावडे याच्याकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.