दैनंदिन जीवनात कुठली गोष्ट आपणास कधी, काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. काहीसा तसाच मला आलेला एक अविस्मरणीय अनुभव. मी नाशिकहून पुण्यासाठी निघालो होतो. नाशिक येथील मध्यवर्ती बस स्थानकात आल्या-आल्याचं मला बस मिळाली. थेट स्थानकातुनचं बस पकडल्यामुळे मला इच्छित अशी खिडकीजवळील जागा मिळाली. मी आरामात बाकावर बसलो. जीवनात येणाऱ्या चढ-उतारांमुळे मी जरा तणावाखालीचं होतो. अत्यंत उदास अशा स्थितीत मी बाकावर डोके टेकवले. बसने नाशिक रोड बस स्थानक पार केले. बेचैन असल्यामुळे झोपही लागत नव्हती. त्यास पर्याय म्हणून तशाच खिन्न स्थितीत बाहेरील निसर्गाचे निरीक्षण करु लागलो.
बघता-बघता माझे सर्व चित्त चालू असलेले खिन्न विचार सोडून निसर्गाचे निरीक्षण करण्यात गुंग झाले. सप्टेंबर महिना सुरु असल्यामुळे स्रुष्टी अतिशय टवटवीत, प्रसन्न दिसत होती. काही दिवसांपूर्वीच सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाणीच-पाणी दिसत होते. कुठे लहान-मोठी तळी साचलेली होती, कुठे छोटे-मोठे ओढे तुडूंब भरुन वाहत होते तर ठिकठिकाणी डोंगर- कपाऱ्यांवर दुधासारखे पांढरेशुभ्र धबधबे लगबगीने कोसळतांना दिसत. सर्वत्र हिरवे-हिरवे लुसलुशीत गवत उगवल्यामुळे स्रुष्टीवर जणू हिरवा गालिचाचं अंथरल्याचा भास होत होता. गवतावर उगवलेली विविध रंगांची, विविध आकारांची फुले एकुणच परिसराची शोभा वाढवित होती. त्या फुलांमधून मकरंद गोळा करण्यासाठी विविध रंगांची, छोटी-मोठी सुंदर फुलपाखरे आनंदाने बागडत होती. तिथेच आसपास विविध पक्षी आपल्या दैनंदिनीप्रमाणे आनंदाने विहार करत होती. ठिकठिकाणी लहान-मोठी गुरे आनंदाने नवजात अशा लुसलुशीत गवताचा आस्वाद घेत होती. मोठमोठी झाडे, लहान-मोठी रोपटी तसेचं विविध वेली आनंदाने हळूवार वाऱ्यासोबत डोलतांना दिसत होते. या स्रुष्टीमधील चैतन्याने मी भारावून गेलो.
मी बघितलेल्या निसर्गातल्या सर्वच गोष्टींकडून आनंदी राहण्याविषयी काहीना-काहीतरी मला शिकायला मिळाले. मी त्या सुंदर अशा फुलपाखरांपासुन छोट्या आयुष्यात आनंदी कसे राहावे हे शिकलो, मुक्त अशा पक्ष्यांकडून नेहमी उद्योगी तसेच आनंदी कसे राहावे हे शिकलो. तर झाडांपासून कुठल्याही परिस्थितीत अचल व स्थिर कसे राहावे हे शिकलो. एकंदरीतच संपूर्ण स्रुष्टीकडून मला शिकायला मिळाले. या सगळ्यावरुन मला महत्त्वाचा बोध मिळाला, तो म्हणजे दैनंदिन जीवनात कधीही, कुठल्याही टप्प्यावर दु:ख कुरवाळून ते वाढविण्यापेक्षा प्रसन्नपणे परिस्थितीचा सामना करुन तिच्यात सुधारणा करणे हे कधीही उचित असते. शेवटी हे मात्र खरे, जगातल्या स्फुर्तिदायक गुरांसारखा निसर्ग हाही एक महान असा स्फुर्तिदायक गुरु आहे.
-अतुल शिरुंडे