अहमदाबाद -पाकिस्तानी कैदेत तब्बल 12 वर्षे घालवलेला भारतीय नागरिक अखेर मायदेशी परतला. आता वृद्धापकाळात का होईना; पण तो मायभूमीत मोकळा श्वास घेऊ शकणार आहे.
ईस्माईल सामा (वय 60 वर्षे) असे पाकिस्तानने नाहक डांबून ठेवलेल्या भारतीयाचे नाव आहे. ते मूळचे गुजरातच्या कच्छ जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकण्यापूर्वी ते गुराखी म्हणून उपजीविका करत होते. ते 2008 मध्ये गुरे चारताना अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले. त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली. त्यांच्यावर भारतीय हेर असल्याचा ठपका ठेवण्यात आला. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या कोठडीत त्यांना सुमारे साडेतीन वर्षे राहावे लागले. त्यानंतर 2011 मध्ये पाकिस्तानी न्यायालयाने सामा यांना 5 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. ती शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्यांची सुटका करण्यात आली नाही.
इकडे सामा यांच्या कुटूंबीयांना त्यांच्या ठावठिकाण्याबाबत कुठलीच माहिती नव्हती. अखेर 9 वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये सामा पाकिस्तानी तुरूंगात असल्याचे त्यांच्या कुटूंबीयांना समजले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. भारतीय उच्चायुक्तालयाने त्यांच्या सुटकेसाठी एक याचिका दाखल केली. त्यावरून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेचा आदेश नुकताच दिला. सुटका झाल्यावर सामा वाघा-अट्टारी सीमेवरून शुक्रवारी भारतीय भूमीत पोहचले. त्यांना अमृतसरला घेण्यासाठी कुटूंबातील काही सदस्यही आले. आता गुजरातला परतण्याचा सामा यांचा मार्ग मोकळा झाला आहे.