रेडा – जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र 25 हजार हेक्टरने वाढ होणार असल्याचे अपेक्षित आहे. दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळ, अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला होता. जिल्ह्यात 16 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून 126 लाख 72 हजार टन ऊस गाळप अपेक्षित आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपात 47 लाख टन इतकी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस गाळपाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्यात गतवर्षी उसाचे 79 लाख 68 हजार मेट्रिक टन गाळप झाले होते. त्यावेळी अवकाळी पावसाचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला होता. त्यामुळे पोषक हवामान असूनही उत्पादकता घटली होती. त्याचा फटका ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना सोसावा लागला होता. गेल्यावर्षी दमदार पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे ऊस क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली आहे. गतवर्षी उसाची उत्पादकता 85 लाख मेट्रीक टन इतकी होती. यंदा हीच उत्पादक वाढली असून यात 6 लाख टनांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण 91 लाख टन उत्पादकता अपेक्षित आहे.
16 साखर कारखान्यांमध्ये सहा खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी क्षेत्रात सोमेश्वर, माळेगाव, श्री छत्रपती, विघ्नहर, कर्मयोगी, संत तुकाराम, राजगड, घोडगंगा, भीमाशंकर, नीरा- भीमा सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. खासगी साखर कारखान्यांमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा,अनुराज शुगर्स, बारामती ऍग्रो, दौंड शुगर, पराग ऍग्रो, व्यंकटेश कृपा शुगर या बलाढ्य आणि प्रस्थापित नेत्यांच्या खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
खासगी कारखान्यांचा विस्तार सहकाराच्या मुळावर
जिल्ह्यात 16 साखर कारखान्यांपैकी 6 खासगी साखर कारखाने आहेत. यंदाच्या गळीत हंगामात 126 लाख ऊस गाळप अपेक्षित आहे. यात सहकारी कारखाने वगळल्यास खासगी कारखान्यांची गाळप क्षमता वाढली असल्याचे दिसून येते. या सहा कारखान्यांमधून यंदा 43 लाख 62 हजार मेट्रिक टन ऊस गाळप अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण गाळप क्षमतेत खासगी कारखान्यांची गाळप क्षमता आता 50 टक्क्यांवर पोहोचत आहे. त्यामुळे सहकारी कारखान्यांनी अवस्था भविष्यात तोळामासा झाल्याशिवाय राहणार नाही. गेल्या चार वर्षांपासून खासगी कारखाने सहकाराच्या मुळावर उठली असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
अपेक्षित ऊस गाळपात कर्मयोगी पुढे जाणार?
यंदाच्या हंगामात अपेक्षित ऊस गाळपात बारामती ऍग्रोची सर्वाधिक ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. ही नोंद 14 हजार 117 हेक्टर आहे. तसेच 12 लाख टन ऊस गाळप अपेक्षित आहे. त्यानंतर सोमेश्वर कारखान्याची नोंद 12 हजार 211 हेक्टर असून यात साडेअकरा लाख टन गाळप अपेक्षित आहे. त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी सहकार कारखान्याची नोंद 10 हजार 480 हेक्टर आहे. मात्र, कर्मयोगी साखर कारखान्याचे ऊस गाळप वरील दोन कारखान्यांपेक्षा जादा अपेक्षित आहे. कर्मयोगीकडून 14 लाख ऊस गाळप अपेक्षित आहे. त्यामुळे अपेक्षित ऊस गाळपात कर्मयोगी साखर कारखाना पुढे जाईल, असा अंदाज आहे.
हजारो हेक्टरची वाढ; कारखान्यांची कसरत
जिल्ह्यात यंदा ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी 25 हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढीची शक्यता आहे. आडसाली क्षेत्रात 52 हजार 131 हेक्टर नोंद झाली आहे. पूर्व हंगामीमध्ये 20 हजार 420 हेक्टर नोंद अपेक्षित आहे. सुरू हंगामासाठी 21 हजार 85 हजार हेक्टर वाढ अपेक्षित आहे. खोडव्याखालील क्षेत्र 41 हजार 528 हेक्टर आहे. जिल्ह्यात उसाचे एकूण क्षेत्र 1 लाख 35 हजार 163 हेक्टर इतके आहे.