पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम : बहुतांश गुऱ्हाळे बंद
पुणे – पश्चिम महाराष्ट्राला बसलेल्या अतिवृष्टीच्या फटक्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. परतीचा पाऊसदेखील मुसळधार बरसल्याने बहुतांशी गुऱ्हाळे बंद आहेत. परिणामी गुळाची आवक घटत असून पुरवठ्यातील घट आणि मागणीतील वाढ यामुळे ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुळाचे भाव काही प्रमाणात वधारले आहेत.
गळीत हंगामापूर्वीच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या पाटस, केडगाव, नांदगाव, यवत भागांत मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळे आहेत. ऑगस्टमध्ये सांगली-कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील गूळ उत्पादकांची गुऱ्हाळे जवळपास महिनाभर बंद होती. परतीच्या पावसाने दौंड तालुक्यातील गुऱ्हाळेदेखील पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाहीत. त्याचा परिणाम गुळाच्या आवकेवर होत आहे. मागणीच्या तुलनेत गुळाची आवक कमी होत आहे.
गुळाच्या दरात प्रतवारीनुसार क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात महिनाभरापूर्वी दर्जानुसार गुळाचे प्रति किलोचे दर 36 ते 44 रुपये असे होते. सध्या किरकोळ बाजारात प्रति किलो गुळाचा दर 40 ते 50 रुपये आहे.
काही वर्षांपासून रसायनविरहित गुळाच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात गुळाच्या 4 हजार ढेपा आणि 2 हजार बॉक्सची आवक होत आहे.