अमरावती/मुंबई – राज्यात सर्वत्र करोना बाधितांची संख्या घटत असताना अमरावती जिल्ह्यात मात्र ती या वर्षी दुसऱ्यांदा चिंताजनक पध्दतीने वाढत आहे.
या वर्षी फेब्रुवारीत करोनाची दुसरी लाट अमरावतीत राज्यात सर्वात आधी आली होती. मार्चमध्ये दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्यात घट आली होती. मात्र नऊ एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान सुमारे 426 बाधित दररोज सापडत होते. तीच संख्या नऊ ते 14 मे दरम्यान 1060 दररोज इतकी झाली आहे.
याच काळात महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 65 हजारहून 40 हजार 900 इतकी खालीआहे. राज्यात एप्रिल 16 पासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यावेळी राज्यात 19 जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत होती. मात्र सध्या आमची चिंता अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ या विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी वाढली आहे. कारण, तेथे बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरमध्येही घट आढळत आहे, असे राज्याचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आलेल्या शैथिल्यामुळे ही वाढ होत असावी. मात्र आरोग्य विभागातर्फे संर्कातील व्यक्तीच्या तपशीलाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या भागातून विषाणूच्या जनुकीय संरचनेच्या तपासणी अधिकाधिक नमुने पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे यातील विषाणूचा नेमका प्रकार समजू शकेल, असे आवटे म्हणाले.
एप्रिलची अखेर आणि मेच्या सुरवातीला यवतमाळ आणि बुलढाण्यात वाढ होत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून या दोन जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात बाधितांमध्ये वाढ दर्शवणाऱ्या जिल्ह्यांशी दुरदृकश्राव्य माध्यमातून संपर्क साधून तेथील वाढीची नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न होत आहे. लॉकडाऊननंतर त्या आधीच्या काळाच्या तुलनेत नांदेडमध्ये 81 टक्के तर मुंबईत 77 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
अमरावतीत नव्या बाधितांपैकी ग्रामीण भागात 83 टक्के बाधित आढळत आहेत. त्यामुळे येथे संसर्गाचा पॅटर्न शहरी भागातून ग्रामीण भागाकडे वळला आहे. तेथे बाधितामंध्ये तरूणांच्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. जिल्ह्यात करोनाने मरण पावलेल्या 1270 पैकी 168 हे 41 ते 50 वयोगटातील तर 95 जण हे 31 ते 40 वयोगटातील आहेत. 697 मृत्यूंच्या कारणांचे परीक्षण करण्यात येत आहे.
का आटोक्यात येत नाही?
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शामसुंदर निकम म्हणाले, विरळ लोकसंख्येमुळे ग्रामीण भागात संसर्ग सहजपणे आटोक्यात आणता येणे शक्य आहे. पण, ते येथे होत नाही. त्यामुळेच या संसर्गपध्दतीचा आम्ही शोध घेत आहोत. भारतीय व्हायरंट येथे आढळत आहे. अमरावतीतून नियमितपणे 180 नमुने जनुकीय संरचनेच्या तपासणीसाठी पाठवत आहेत. त्यातील बहुतांश नमुन्यात बी. 1.617 हा दुहेरी विषाणू आढळत आहे.